18 लाखांचे सक्शन पंप,बार्ज केले नष्ट करीत गुन्हा दाखल केला.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील काल्हेर, कशेळी ते दिवे अंजुर या खाडीपट्ट्यातील नदी खाडीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे शासकीय नियमांचे उल्लंघन करून रेती उत्खनन सुरू आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने याबाबत भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजीत खोले यांच्या कडे तक्रार जाताच त्यांनी तातडीने दखल घेऊन रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात धडक कारवाई करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून आज शुक्रवारी सकाळी बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील कशेळी खाडीत शासना कडील बोटीच्या सहाय्याने खाडी पात्रात गस्त घालत असताना भिवंडी तालुक्यातील आलिमघर येथे खाडीपात्रात 1 बार्ज 2 सक्शन पंप अनाधिकृतरित्या रेती उपसा करीत असल्याचे आढळून आले.कारवाई पथकाची चाहूल लागताच सक्शन पंप वरील कामगार पाण्यात उड्या मारून पसार झाले.त्यानंतर पथकाने सक्शन पंप व बार्ज ही मालमत्ता जप्त करून नष्ट करण्यासाठी खाडीमार्गे काल्हेर येथील बंदराच्या किनाऱ्याजवळ आणून 10 लाख रुपये किमतीचे 2 सक्शन पंप बाहेर काढून नष्ट केले तर 8 लाख रुपये किमतीचा 1 बार्ज जाळण्यात येऊन त्यास कटर च्या साह्याने होल पाडून मध्यभागी नेऊन बुडविण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 18 लाख किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. या कारवाई संदर्भात नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.भिवंडी प्रांत अधिकारी व तहसीलदारानी यांनी महसूल विभागाच्या धडक कारवाई मुळे अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या माफियांच्या धाबे दणाणले आहेत.