भिवंडी ( प्रतिनिधी )कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस सेवा भिवंडीत सुरू असुन दररोज शेकडो प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी भिवंडी येथून कल्याण येथे प्रवासी घेऊन निघालेल्या एका
ए.सी (वातानुकुलीन) बसच्या इंजनला भिवंडी एस आगारा जवळील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर सायंकाळी अचानक आग लागण्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणून तात्काळ विझवली त्यामुळे मोठी दुर्गटना टळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली आहे. कल्याण मनपाची बस क्रमांक एम एच ०५ आर ११२६ ही एसी बस नेहमी प्रमाणे भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रवाशांना घेऊन कल्याणच्या दिशेने निघाली होती.ही बस भिवंडी एसटी आगार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया
समोर आली असता बस च्या मागील बाजूस असलेल्या इंजन मधून धूर निघत असल्याचे त्या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले.त्यांनी तत्काळ बस चालकास ही माहिती दिल्यावर त्यांनी सदर बस सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय समोर रस्त्याकडेला थांबविली.त्यावेळी बस मधील सर्व ३५ प्रवासी यांनी तात्काळ सुखरूप बस बाहेर पडून आपला जीव वाचवला.यावेळी तत्पर असलेल्या पोलिसांनी एसीपी कार्यालयातील आग प्रतिबंधक यंत्रणा वापरून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर आलेल्या भिवंडी मनपाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी गाडीतील इंजिन मधील संपूर्ण आग विझविली आहे.