भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी या करीता काही इच्छुक उमेदवारांनी मुंबईपासून दिल्ली
पर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वाऱ्या केल्या.मात्र त्यांच्या अर्ज-विनंत्यांकडे दुर्लक्ष करीत भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला. त्यामुळे गेल्या ३५ वर्षांपासून सुरु काँग्रेसची परंपरा खंडित होणार असून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून काँग्रेसचा ” पंजा ” गायब होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.या घटनेने शहरातील अल्पसंख्यांक मतदारांसह ग्रामीण भागातील परंपरागत काँग्रेस मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. २००९ साली भिवंडी लोकसभा मतदारसंघ जाहीर होण्यापूर्वी भिवंडी हा डहाणू लोकसभा मतदार
संघात सामिल होता.त्यामुळे या मतदारसंघातून 6 वेळा काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाले होते.त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदार संघात सुरेश टावरे हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीने एक वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्या नंतर दोन वेळा काँग्रेस उमेदवारांचा
भाजपाचे कपिल पाटील यांनी पराभव केला होता. मात्र काँग्रेसचा प्रभाव कमी झालेला नाही, हे स्थानिक मतदारांनी भिवंडी महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरगोस मतदान करीत बहुमत देत दाखवून दिले.
काँग्रेस पक्ष भिवंडीत मजबूत आहे
हे वरिष्ठ नेते व महाविकास आघाडी कडे दाखवून देण्यात भिवंडीतील स्थानिक पुढारी कमी पडले.
त्यामुळे परिणामी भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)यांच्याकडे गेली.काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी साठी इच्छुक असलेले जिजाऊ विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी स्वतःला अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) लोकसभा निवडणूक लढणार हे निश्चित झाल्याने परंपरागत असलेल्या काँग्रेसला जोरदार चपराक मिळाला आहे. खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा एक रात्र भिवंडीत थांबली होती.त्यामुळे काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झाले होते.असे असताना महाआघाडीने राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार)चा उमेदवार जाहीर करून काँग्रेस कार्यकर्त्यांना जोरदार धक्का दिला आहे.या घटनेने काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून बंडाची देखील भाषा केली.मात्र त्यांचा राजीनामे बार फुसका ठरला आहे. या सर्व घडामोडीने भाजपा उमेदवार कपिल पाटील यांना आपल्या प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असुन त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. मात्र या वेळी मतपत्रिकेवर काँग्रेसचा पंजा चिन्ह राहणार नसल्याने अनेक निष्ठावंत काँग्रेस पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली.
