महाविकास आघाडी उमेदवाराचे काम न करण्याची भुमिका.लवकरच निर्णय जाहीर करणार – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत नसल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून गुरूवारी भिवंडी ग्रामीण काँग्रेसच्या बैठकीत जोपर्यंत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे सांगत नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा एकमताने निर्णय पदाधिकारी व कार्यकर्तेचेवतीने घेण्यात आला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या गटात खळबळ माजली आहे.

भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक सोनाळे येथे ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष शरद ठाकरे,दादा पटेल,दिलीप पाटील,जेष्ठ नेते केशव लाटे, तालुका अध्यक्ष विजय पाटील,इंटक जिल्हा अध्यक्ष पंढरी भोईर,महिला तालुका अध्यक्ष वृषाली भोईर,युवक प्रदेश सचिव निलेश भोईर,युवक तालुका अध्यक्ष संदेश वखारे, ओबीसी तालुका अध्यक्ष अशोक पालकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे म्हणाले की भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद नसताना त्यांनी ही जागा हिसकावून घेतली आता यापुढे विधानसभा निवडणुकीत जर राष्ट्रवादी व शिवसेनेने ठाणे ग्रामीण मधील सर्व जागा घेतल्या तर आहे ती काँग्रेस सुद्धा संपून जाईल, त्यामुळे भिवंडी ग्रामीण व पूर्व पश्चिम पैकी दोन जागा आणि जिल्हा परिषद,नगरपरिषद मध्ये काँग्रेसची जिथे ताकद आहे त्या जागा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा प्रचार करणे शक्य नसल्याचे चोरघे यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक तर गेली पण येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून त्यांना न्याय मिळणार नसल्यास महाविकास आघाडीचे काम करणे शक्य होणार नाही याबाबत वरिष्ठांशी काय निर्णय होतो ते लक्षात घेऊन येत्या 1 मे रोजी मी माझा निर्णय देणार असून तोपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्ते व नेते यांनी प्रचारात सहभागी होऊ नये असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती चोरघे यांनी दिली.तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले कि तीच भूमिका तीन दिवसापूर्वी काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांना यांना विश्वासात न घेता त्यांच्या नावाने कार्यकर्ते गोळा करून बैठक घेतली ती गैर आहे.जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे एक मे रोजी पक्षाची भुमिका जाहीर करतील त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतील तो पर्यंत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडी उमेदवाराचे काम करणार नाही अशी भुमिका सुचना जिल्हाध्यक्ष चोरघे यांनी बैठकीत घेतली आहे.त्यामुळे महा विकास आघाडी मध्ये खळबळ उडाली आहे.