भिवंडीतील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते नाराज
भिवंडी (शरद भसाळे) देशात काँग्रेस मजबूत करून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमय वातावरण करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो न्याययात्रा काढली. या न्यायायात्रेचे सर्वच ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र झटले मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असलेले नाशिक, पालघर,ठाणे, मुंबईत धारावी, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी हे काँग्रेस पक्षाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न मिळता शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला मिळाले त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराज झाले आहेत. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला राज्यस्तरीय पक्षांच्या मागे फरफटत जाण्याची वेळ आली आहे, असे सांगत भिवंडीतील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत असुन पक्षांतर करण्याचे विचारात आहेत. भारत जोडो न्याययंत्राच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने निवडणुकीचे वातावरण निर्माण करण्याबरोबर पक्षांतर्गत चाचपणी आणि पक्ष कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला.दरम्यान हि न्याययात्रा भिवंडीत येणार या हेतूने ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,माजी आमदार रशिद ताहीर मोमीन यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मेहनत घेऊन वातावरण निर्माण केले.त्यातच भिवंडीत एक रात्रीचा मुक्काम करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे काँग्रेसला निवडणूक योग्य पूरक वातावरण निर्माण झाले. या पूरक वातावरणाचे मतपेटीत रूपांतर करण्यासाठी इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे, माजी खासदार सुरेश टावरे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे आपली बाजू मांडली. तरी देखील हि भिवंडी लोकसभेची जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. तर ज्या मार्गावरून हि न्याय यात्रा गेली व या यात्रेचा समारोप झाला त्या नाशिक, पालघर, ठाणे,मुंबईत धारावी व दक्षिण मध्य मुंबई,भिवंडी मध्ये शिवसेना उबाठा व शरद पवार राष्ट्रवादी यांना उमेदवारी मिळाली.भिवंडी लोकसभा क्षेत्रात निर्णायक भूमिका बजावणारी अल्पसंख्यांची काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. या मतदारांना पंजा हे निवडणूक चिन्ह माहिती आहे. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह त्यांच्या ओळखीचे अथवा सामान्य जीवनात ओळखीचे नसल्याने ते या चिन्हापासून अनभिन्न आहेत. त्यामुळे या जागेवर अल्पसंख्यांकांच्या मतदानाबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. यासाठी काँग्रेसजन पंजाच्या निशाणीवर निवडणूक लढण्याचा आग्रह धरीत आहेत.भिवंडी लोकसभा मतदार संघात आजही काँग्रेसच्या चिन्हावर उभे करण्याची शेवटची धुगधुगी उरली आहे.काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पक्षांतर करण्याचे तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी हे पुन्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईतील पक्ष कार्यालयात भेट घेऊन पक्ष स्थिती व भिवंडीतील मतदारांची बाजू मांडणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,भिवंडी काँग्रेसचे सचिव आरशी आझमी यांनी दिली.
