भिवंडी ( प्रतिनिधी ) देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होत आहे हा सन्मान फक्त देशातील सजक नागरिकांमुळे शक्य होत आहे असे गौरव उद्गगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले आहे. आयोजित कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी व नागरिक,विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भिवंडीतील प. अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रांगणात डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन निमित्त सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी व्यासपीठावर प.अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे संस्थाध्यक्ष विजय जाधव,कार्याध्यक्ष बी.डी. काळे,उपाध्यक्ष अरुणा जाधव,सरचिटणीस रोहित जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भोईर,मुख्याध्यापक सुधीर घागस उपस्थित होते.या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केले.असाच अनेकांनी देशासाठी त्याग केला आहे आज आपण आपल्या कर्तव्यासह जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे.

प्रत्येकाने आपापल्या परंपरांची जपणूक करीत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म आहे.समाजाचे सहयोग घेऊन समाजासाठी कार्य करणे हाच खरा धर्म आहे.देश पुढे जात असताना येथील भारतीयांची प्रतिष्ठा वाढली. कोण किती कमावत त्यापेक्षा समाजासाठी किती वाटतो त्यावर माणसाची प्रतिष्ठा ओळखली जाते असे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीत यश मिळवून त्याचा समाजासाठी उपयोग करावा अशा शुभेच्छा डॉ.मोहन भागवत यांनी दिल्या.
चौकट
संस्थेतर्फे विजय जाधव यांनी डॉ मोहन भागवत यांना भगवान श्री.राम मूर्ती व अण्णासाहेब जाघव यांचे चरित्र पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान केला.कार्यक्रम प्रास्ताविकात कार्याध्यक्ष बी डी काळे तर मुख्याध्यापक सुधीर घागस यांनी सूत्रसंचालन केले.सरचिटणीस रोहित जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.या प्रसंगी विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

