भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना,भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यामध्ये दीड लाखांचे आठ मोबाईल व टेम्पो व त्यामधील माल असा साडे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास समांतर गुन्हे शाखा करीत असताना गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अमोल देसाई यांना सराईत मोबाईल चोरट्याची माहिती मिळाली असता,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,धनराज केदार,पोलिस हवालदार अमोल देसाई,मंगेश शिर्के,प्रकाश पाटील,सुनिल साळुंखे,पोलिस शिपाई अमोल इंगळे,भावेश घरत,नितीन बैसाणे,रविंद्र साळुंके यांनी सापळा रचून सराईत गुन्हेगार अख्तर आमीर शेख (वय 50 रा.टेमघर) यास ताब्यात घेवुन त्याच्या कडून नारपोली पोलिस ठाण्यासह निजामपूर,पेल्हार, शिळ डायघर या पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एकूण एक लाख 44 हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
तर दुसऱ्या कारवाईत नारपोली पोलीस ठाणे हद्दीत तांब्याची तार चोरी करून निघालेल्या टेम्पोच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासून करीत असताना गुन्हयात वापरलेल्या वाहनाचा प्रकार व क्रमांक निष्पन्न केला आणि आरोपी रामजी जोगिंदर जयस्वाल, (रा.अंधेरी,मुंबई) यास ताब्यात घेवुन गुन्हयात वापरलेला 6 लाख रुपयांचा टेम्पो व टेम्पोतून चोरीस गेले एक लाख 85 हजार रुपयांचा एकूण 7 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
