भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळा क्र. ११ व ८ या शाळांमध्ये मुलांना शिक्षण देणाऱ्या दोन उपशिक्षिकांनी बनावट दाखले तयार करून त्यावर मुख्याध्यापक म्हणून स्वाक्षरी करीत त्यांच्या नांवे बँकेतून कर्जे मंजूर करून घेतल्या प्रकरणी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी दोन महानगरपालिकेच्या शिक्षिकांना निलंबित केले आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने शहरात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. या दोन महिला शिक्षिका बनावट शिक्षकांच्या नावाने कर्ज मिळवून देत असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी दोन्ही महिला शिक्षकांना तत्काळ निलंबित केले आहे. बनावट शिक्षकांच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करून आतापर्यंत डझनभर लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.शिक्षकांच्या या रॅकेटमध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता चर्चा आहे. भिवंडी महापालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुमा अहमद नाशिककर ह्या मनपाच्या शाळा क्रमांक ८ मध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत असून अकिला मो हसन ह्या शाळा क्रमांक ११ मध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नसलेल्या चार लोकांच्या नावे त्यांची बनावट पगार स्लिप बनवून त्यावर स्वतःमुख्याध्यापकाची सही करून प्रत्येकीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १५ लाख मंजूर करून घेतले. या घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी क्रभिनिश महानगरपालिका/प्रशिवी/२७८/ येथे जाऊन आदेश २०२४ आणि ज.क्राभिनीश महानगरपालिका/प्रशिवी/२७९/२०२४ जारी करून दोन्ही उपशिक्षकांना निलंबित करण्यात केले आहे. काढलेल्या निलंबनाच्या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे की, बनावट शिक्षकाच्या नावाने मुख्याध्यापकाची खोटी स्वाक्षरी करून बँकेकडून कर्ज घेणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे.या प्रकरणात दोन्ही शिक्षकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जनतेच्या मनात महापालिकेची प्रतिमा डागाळण्याचे काम केल्याचे नमूद केले आहे. त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम चारच्या उपनियम (१) अन्वये अधिकाराचा वापर करून हुमा अहमद नाशिककर आणि अकिला मो हसन मोमीन यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५६ (२) (एफ) अन्वये तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र पदाचा गैरवापर करून बनावट आणि खोटे कागदपत्रे बनविल्या प्रकरणी मनपा प्रशासन कधी फौजदारी कारवाई करणार आहे, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदर शिक्षक महिलांनी शहरात देखील काही नागरिकांना कर्ज मिळवून देण्याच्या हेतूने फसवणूक केली आहे. त्यापैकी शहरातील इस्लामपूर भागात राहणाऱ्या एका इसमास ५ कोटी कर्ज मिळवून देण्यासाठी अकिला मो हसन मोमीन या शिक्षिकेने ५ लाख रुपये घेतले होते. हि रक्कम परत मागितली असता अकिला मोमीन या शिक्षिकेने दिलेला ५ लाखाचा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे या प्रकरणी भिवंडी न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
