भिवंडीचा डीपी सुधारण्यासाठी हरकती आणि सूचनांवर सुनावणी सुरू,नागरिकांनी पालिकेत केली गर्दी

भिवंडी


भिवंडी (शरद भसाळे) : भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास (डीपी) आराखड्याशी संबंधित ११,००० सूचना व हरकती महापालिकेकडे आल्या होत्या. या प्रकरणांची सुनावणी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संचालक महाराष्ट्र नगररचना द्वारा नियुक्त केलेल्या ५ सदस्यीय समितीने १३ मार्चपासून सुरू केली आहे. महापालिका मुख्यालयात असलेल्या आयुक्त सभागृहात ४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ते सायंकाळी ५.३० या वेळेत समिती सदस्यांचे पथक हे नागरिकांच्या सूचना व तक्रारी ऐकून घेतील. भिवंडी महानगरपालिका सहाय्यक संचालक नगर रचना विकास योजना विशेष घटक स्मिता कलकुटकी यांनी नागरिकांनी नियोजित वेळी उपस्थित राहून सुनावणीस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.  
भिवंडी महापालिकेचे प्रशासक अजय वैद्य यांनी भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिका सुधारित प्रारूप विकास आराखडा १२ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित करून, शहरवासीयांना शहर विकास आराखड्याशी संबंधित त्यांच्या मौल्यवान सूचना आणि हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रारुप डीपी आराखडा चांगल्या प्रकारे समजून घेतला असून त्यांनी ११ हजार सूचना व हरकती नोंदवल्या आहेत. मुख्य संचालक, शहर निर्मिती, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार भिवंडी महानगरपालिकेच्या डीपी प्रारूप विकास आराखड्यावरील हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी महापालिका प्रशासक अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती शासनाने गठित केली आहे. या समितीत महापालिकेचे प्रशासक अजय वैद्य यांच्यासह मनोहर यशवंत भार्गव, अशोक काशीराव खांडेकर, विनय एस निकम, अलीम अब्दुल कासीर फौजी (स्थापत्य अभियंता) यांचा समावेश आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचना आणि हरकती ऐकून डीपीमध्ये सुधारणा सुचवणार आहे.सरकारने समिती सदस्यांना दररोज 300 ते 500 सूचना आणि हरकती ऐकण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचना व हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर समितीचे सदस्य त्या ठिकाणी जाऊन नोंदवलेल्या सूचना व हरकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करतील. ज्या ठिकाणी हरकती दाखल केल्या आहेत त्या सर्व ठिकाणे, रस्ते आणि भूखंडांचे निरीक्षण केल्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने घेतलेला निर्णय राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच भिवंडी महापालिकेचा पुढील 20 वर्षांचा प्रारूप विकास सुधारित आराखडा आकारास येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *