भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा क्षेत्रातील 6 म्हणजे प्रत्येक विधानसभा निहाय 9 असे 54 भरारी पथके 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.तसेच यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 लाख 39 हजार 449 मतदार यांची नोंद करण्यात आलेली आहे. अशी माहिती भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्याच्या सोबत सह निवडणूक अधिकारी उदय किसवे उपस्थित होते.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल वाजले असुन भाजप,काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सतर्क झाले असुन प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे.या निवडणूक दरम्यान आदर्श आचारसंहिता पालन व्हावे यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.निवडणूक दरम्यान होणाऱ्या प्रशासकीय कामकाजाची माहिती व्हावी या साठी पत्रकार परिषद निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी सांगितले किभिवंडी मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.चार मे रोजी उमेदवारी अर्ज यांची छाननी होऊन सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.तर या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी भिवंडी तालुक्यातील सावद येथील प्रशस्त गोदामात आयोजित करण्यात आले आहे.त्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन संरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम सुद्धा बनवण्यात येणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 लाख 39 हजार 449 मतदार यांची नोंद करण्यात आलेली असून येत्या तीन मे पर्यंत मतदार नाव नोंदणीची मुभा असल्यानं ही मतदार संख्या अजूनही वाढणार आहे. या मतदारांमध्ये 85 वर्षांवरील 20272 व दिव्यांग असलेल्या 9053 अशा एकूण 29325 मतदारांची नोंद असून या निवडणुकीत प्रथमच ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या नागरिकांना टपालाद्वारे मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे.या निवडणुकीसाठी 2189 मतदान केंद्र असणार असून यामध्ये मुरबाड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक 511 मतदान केंद्र आहेत.निवडणुकी संदर्भातील तक्रारी करण्यासाठी त्यासोबतच उमेदवारांच्या मालमत्ता गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवण्यासाठी मतदाराला आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे. हे तपासण्यासाठी तसेच अमली पदार्थ शस्त्र,पैसा,दारू यांची माहिती देण्यासाठी तर उमेदवारांना प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा विविध ॲप विकसित करण्यात आलेले आहे. तक्रारी संदर्भातील ॲपवर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर त्याचे निराकरण पुढील शंभर मिनिटांमध्ये करून तशी माहिती निवडणूक प्रक्रिये मार्फत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या निवडणुकीत उमेदवारास निवडणूक खर्च मर्यादा ही 95 लाख रुपये करण्यात आलेली आहे.तसेच शहरातील बँनर पोस्टर्स काढून टाकण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
नियंत्रण कक्ष सुरू
निवडणूक कालावधीमध्ये विविध तक्रारी संदर्भात मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक 18002331114 हा सुरू करण्यात आला असून तो 24 तास सुरू राहणार आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत 2019 मध्ये भिवंडी लोकसभेतील मतदानाची टक्केवारी ही कमी होती त्या वाढीसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हे सुरू राहणार असून समाजाने सुद्धा मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घेण्याचा आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.
