भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील ओवळी गाव परिसरातील मैदानात असलेल्या भंगाराच्या दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग लागल्याने परिसरातील रहिवासी नागरिकांना मध्ये मोठी धावपळ उडाली होती.पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे आठ तास रासायनिक द्रव्य मिश्रीत पाण्याचा मारा करून ही आग विजवली आहे.आगीने रौद्र रूप धारण केल्याने या आगीत 10 ते 15 दुकाने भस्मसात झाली.ही आग कशामुळे लागली याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही.

काही दिवसांपूर्वी याच परिसरातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील गोदाम व भंगाराच्या दुकानास मोठी भिषण आग लागली होती.त्यामुळे या परिसरातील भंगार दुकानाचा आगीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.काल शनिवारी मध्यरात्री 11: 45 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.दुकानात अग्निशमन प्रतिबंधित साहित्य नसल्याने तसेच परिसरात पाणी उपलब्ध न झाल्याने या आगीने रौद्र रूप धारण केले होते.या आगीत 10 ते 15 भंगार दुकाने जळून खाक झाली.आग लागल्याची वर्दी मिळताच भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल प्रमुख राजेश पवार हे आपल्या जवान पथक आणि दोन अग्निशमनाच्या गाड्या घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले परंतु या गाड्यांमधील पाणी संपल्यानंतर आजूबाजूला पाणी उपलब्ध न झाल्याने या आगीने रौद्र रूप धारण करून पसरत गेली.मैदानात लाकडी शेडचे असलेली भंगाराच्या दुकानात कागदी पुठ्ठे आणि प्लास्टिकचे ज्वालाग्राही सामान व भंगार सामान असल्याने ते आगीच्या भक्षस्थानी पडले. रविवारी सकाळी 9:37 वाजता हि आग शमल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख राजेश पवार यांनी दिली.नारपोली पोलिसांनी या आगी संदर्भात नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.

भिवंडी ग्रामीण परिसरात मोठ्या संख्येने गोदाम असल्याने त्यामधून वेस्टमाल,पुठ्ठे असे बरेच भंगार निघते.त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने ही अनधिकृत भंगारची दुकाने खाजगी जागेवर आणि सरकारी जागेवर असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साठविले जाते. तेथेच भंगार दुकानाचे मालक व कर्मचारी जेवण बनवितात, तर काहीजण आपला संसार देखील थाटतात. मात्र या ठिकाणी आग लागू नये,अशी खबरदारी घेण्यात येत नाही.त्यामुळे नेहमी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ऐन निवडणूक काळात अचानक रात्रीच्या वेळी या ठिकाणी आग लागल्याने संशय व्यक्त केला जात असून आगीचे कारण समजू शकले नाही.मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही.