काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांना मध्ये खळबळ
भिवंडी ( बी.एस. ) विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असून भिवंडीत सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभा निहाय मतदारसंघांमध्ये राजकीय व विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व,भिवंडी पश्चिम,शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.भिवंडी पश्चिम, शहापूर व मुरबाड या तीन विधानसभांवर आम्ही दावा करणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी
पत्रकारांना दिली.
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
खासदार सुरेश म्हात्रे यांनी दावा केलेले तीनही विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीकडे असून या तिन्ही मतदार संघामध्ये भाजपा व अजित पवार गटाचे वर्चस्व आहे.भिवंडी पश्चिम मतदार संघात भाजपचे आमदार महेश चौगुले,
मुरबाडमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे तर शहापूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचे व महायुतीचे वर्चस्व असल्यानेच या तीनही मतदार संघावर आम्ही दावा केला असल्याची माहिती खा. म्हात्रे यांनी दिली.
भिवंडी पश्चिम मतदार संघावर आम्ही दावा करणार असून विधानसभेच्या
२००४, २००९,
२०१४,आणि २०१९ या सर्व विधानसभेचा गत 20 वर्षांचा इतिहास व निवडणुकांचा निकाल पाहिल्यास या वीस वर्षात भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये मुस्लिम मतदारांसह अन्य भाषिक मतदारांनी काँग्रेस पक्षाला नाकारले आहे. मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या बाजूने नव्हता,मुस्लिम मतदार हा नेहमी आघाडी सरकारच्या बाजूने व आता महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला आहे.त्यातच मागील दहा वर्षात लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभा निवडणुकीत देखील येथून काँग्रेसला दारून अपयश आल्याने भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रबळ दावा असल्याची माहिती खा.म्हात्रे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भिवंडीत जोरदार मोर्चे बांधनी सुरू केली आहे. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघां मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळजनक वातावरण पसरले आहे
