भिवंडी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाचे घोळ अद्याप कायम आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्यावतीने अद्याप उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. तर अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीचे रिंगणात येण्याची तयारी सुरू केली आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाची मोठी ताकद असतानाही अद्याप जागा जाहीर झालेली नाही.त्यामुळे या जागेवरून शिवसेना व भाजप पक्षात मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असतानाच भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काल्हेर येथील भाजपचे ज्येष्ठ नेत्या माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटील यांनीगुरूवार ( दि.24 ) दुपारी पदाधिकारी व कार्यकर्तेना सोबत घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भिवंडी ग्रामीण निवडणूक निर्णय अधिकारी यांना कडे दाखल केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.मात्र ही जागा शिवसेना लढविण्याची तयारी सुरू केली असतानाच स्नेहा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रचंड खळबळ माजली आहे. विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे शिवसैनिक सुद्धा चिंताग्रस्त दिसत आहे.

भिवंडी ग्रामीण मतदारसंघांचा सर्वागीण विकास घडविण्यासाठी निवडणूक मैदानात उतरले असल्याची माहिती उमेदवार पाटील यांनी पत्रकारांना दिली.
कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या असलेल्या स्नेहा पाटील यांनी भिवंडी ग्रामीण भागाच्या समस्यांचे निराकरण करून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित असल्याचे ही जाहीर केले.
भिवंडीतील चाविंद्रा रोड फरहान हॉलमधील निवडणूक कार्यालयात गुरूवारी दुपारी माजी सरपंच स्नेहा पाटील यांची वाजतगाजत कार्यकर्तेनी मिरवणुकी काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल्हेर येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्री वेताळ महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली.
निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करताना माजी सरपंच छत्रपती पाटील,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील, यशवंत सोरे,माजी सरपंच राजन भोईर, जयवंत पाटील, राजन मढवी, निलेश गुरव, दयानंद पाटील,श्रीकांत गायकर आदींसह हजारो ग्रामस्थ,भाजप पक्षाचे पदाधिकारी, व नागरिकांची उपस्थिती होती.
भिवंडी ग्रामीण भागातील महिलांसह विविध प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडले गेले नाहीत. तालुक्यातील गावे व दुर्गम भागातही पिण्याचे पाणी मिळत नसून, अनेक रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. तालुक्यातील महिलांना स्थायी रोजगार मिळवून देण्यासाठी महिला सक्षमीकरण गरजेचे आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे आपण मतदारांच्या आग्रहानुसार निवडणूक लढवित असल्याचे स्नेहा पाटील यांनी सांगितले.
————–
चौकट
स्नेहा पाटील या उच्चशिक्षित उमेदवार असून, त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी विक्रमगड येथील शासकीय पदविका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहिले. मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्य केले. त्यांनी काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले होते. सध्या त्या लाडकी बहीण योजनेच्या आढावा समितीत अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.