भिवंडी ( प्रतिनिधी ) बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्णजी शास्त्री यांच्याभिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गांव येथील कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाल्याने कार्यक्रमात प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री कार्यक्रमास्थळी नाराज होत कार्यक्रम स्थळ अर्ध्यावर सोडून निघून गेले आहेत.सुदैवाने पोलिसांनी गर्दी पांगवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

आज शनिवारी दुपारी भिवंडीतील दिवे अंजुर गांव परिसरातील य इंडियन कॉर्पोरेशन या गोदाम संकुलात धीरेंद्र कृष्णजी शास्त्री यांच्या सत्संग व दर्शन कार्यक्रमाचे आयोजन दुपारी 3 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भक्तांना विभूती घेण्यासाठी सर्वप्रथम महिलांना,त्यानंतर पुरुषांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले. मात्र विभूती घेण्यासाठी स्त्रिया व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला आणि व्यासपीठावर चढण्यासाठी सर्वांनीच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये व्यासपीठा वरील शिडीची रेलिंग तुटली त्यामुळे काही महिला खाली पडल्याने गोंधळ उडाला.त्यानंतर परिस्थिती हाता बाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करीत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.या गोंधळात धीरेंद्र शास्त्री हे व्यासपीठावरील कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेले.सुदैवाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळल्याने चेंगराचेंगरी मुळे येथे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे.