भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या वराळा तलावातून लाखो नागरिकांना पाणी पुरवठा महापालिका प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे हा पवित्र तलाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची महा
पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र गेल्या काही महिन्या पासून पालिका प्रशासनाने या तलावाचे स्वच्छते कडे दुर्लक्ष केल्याने वराळ तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तरंग पसरून दुर्गंधी पसरली आहे.तसेच तलावा लगत असलेल्या इमारती मधून सांडपाणी तलावात शिरल्याने सदर पाणी दुर्गंधीयुक्त प्रदुषित होत आहे त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.या गंभीर प्रश्न समस्या संदर्भात
स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांनी लेखी पत्रव्यवहार करून सुध्दा दुर्लक्ष करीत असल्याने ताडाळी व कामतघर येथील ग्रामस्था मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असुन राज्य शासन व महापालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर, माजी गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे.

ठाणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या भिवंडीतील वराळ देवी मंदिर शेजारी असलेल्या कामातघर लगत हा तलाव असुन ग्रामस्थांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. या तलावातून जुन्या भिवंडीकरांना महापालिका क्षेत्रात दररोज 4 एमएलटी पाणीपुरवठा पिण्यासाठी केला जातो. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश मुर्ती विसर्जन व दुर्गादेवी मुर्ती विसर्जन तसेच तलाव किनारी इतर धार्मिक कार्यक्रम होत असतात महापालिका प्रशासनाकडून तलावाची योग्य पद्धतीने देखभाल होत नसल्याने या तलावा पाण्यात कचरा साठून हिरवा तवंग निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व रहिवासी ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर तलावाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या तलावाची दुर्दशा झालेली आहे.या तलावात फेणे पाडा, फेणेगाव,मानसरोवर येथील ड्रेनेज चे घाण पाणी थेट तलाव पात्रात सोडलं जात आहे.ज्यामुळे या दुर्गंधीत अजूनच वाढ होत आहे.हे पाणी शहरातील काही भागातील नागरिकांना पिण्यासाठी वापरले जात त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पालिका प्रशासन तत्त्पर असते मात्र पाणी स्वच्छते बाबतीत उदासीन भूमिका बजावत असल्याचे माहिती भाजपचे माजी गटनेते निलेश चौधरी व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सतिष चौधरी यांनी दिली.त्यामुळे स्थानिक कामतघर ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असुन पत्र व्यवहार करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.येत्या 15 दिवसात तलावातील संपूर्ण हिरवा तवंग काढून पाणी शुद्धी करणासाठी विशेष योजना न राबविल्यास हा तलाव कामतघर ग्रामस्थ ताब्यात घेतील असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी दिला आहे.
..चौकट प्रतिक्रिया..
महापालिका प्रशासनाच्या वतीने वराळ तलावातील हिरवा तवंग तसेच शेवाळ काढण्या साठी उपाययोजना केली जात आहे.जल शुद्धीकरणासाठी तज्ञ व्यक्तींच्या मदतीने काम हाती घेतले जाणार आहे. तलावातील दुर्गंधी व जलप्रदूषण टाळण्यासाठी भविष्यात मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करून तलाव स्वच्छतेवर भर दिला जाईल अशी माहिती भिवंडी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.वराळ तलाव स्वच्छता व सुशोभीकरण यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाला असून त्याचे काम लवकरच सुरू होण्याने या तलाव परीसराचा कायापालट होईल असा विश्वास आयुक्त अजय वैद्य यांनी व्यक्त केला आहे.