भिवंडी ( भानुदास भसाळे ) राज्य शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दिरंगाईबाबत अनेकांकडून तक्रारी होत असल्याने आज गुरुवारी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी भिवंडी तालुक्यातील पिंजरे पिळंजे गांवात जलजीवन मिशनच्या कामांची गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करत ही कामे तात्काळ प्रगती पथावर आणून पूर्ण करावीत असे आदेश जिल्हा प्रशासन व ठेकेदारांना दिले आहेत
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण,जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदिया,गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांसह भिवंडी पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते.ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 720 कामे सुरू आहेत.

काही ठिकाणी अडथळे आल्याने कामांमध्ये दिरंगाई होत आहे.त्यामुळे या पाहणी दौऱ्यात कामांमध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन ती कामे कशी मार्गी लागतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे असे सांगत काही ठिकाणी वन खात्याच्या जमिनी तर काही ठिकाणी खाजगी जमिनींमुळे योजना राबवण्यात उशीर झाला आहे.परंतु या सर्व अडचणींवर मात करून सर्व कामे प्रगतीपथावर कशी राहतील यासाठी जिल्हा प्रशासन पुढील काळात प्रयत्नशील राहील असे रोहन घुगे यांनी स्पष्ट केले. तर शहापूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविली जाणारी भावली प्रकल्प योजनेचे काम गतिमान करण्यात येणार आहे.या योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून या योजनेमधून शहापूर तालुक्यातील 97 गाव व 259 पाड्यांमध्ये पाणी पुरवठा होणार असून ही योजना पूर्ण झाल्यावर या सर्व गावांना सुद्धा पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.जलजीवन मिशनच्या योजनेमध्ये ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे काम रखडल्याची तक्रार
करण्यात आल्याने घुगे यांनी कामात कुचराई सहन केली जाणार नाही काम व्यवस्थीत व लवकर करा असे आदेश यावेळी दिले.