भिवंडी ते कल्याण मेट्रो 5 किमी जमिनी खालून जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

भिवंडी


मुख्यमंत्र्यांचे घोषणेचे नागरिकांनी केले स्वागत..

भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे- भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गिकाचे काम पुनर्वसनामुळे रखडले असून जिथे अधिक पुनर्वसनाची गरज आहे, त्या कल्याण ते भिवंडी मार्गातील पाच किमी भागातून मेट्रो जमिनीखालून नेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. त्यामुळे मान्यवरांनी त्यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.
         भिवंडीत दळणवळणाचे प्रभावी साधन नसल्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करून मेट्रो प्रकल्पास चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले मात्र त्यानंतर मात्र काही काळ मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम रेंगाळत होते त्यामुळे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाच्या चर्चेत ठाणे – भिवंडी – कल्याण हा मेट्रो मार्ग रखडल्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. भिवंडी  हे भारताचे मँचेस्टर असून लॉजिस्टिक हब म्हणून भिवंडी शहर पुढे येत आहे. या शहराच्या विकासासाठी मेट्रो वेळेत पूर्ण करा, अशी मागणी करण्यात आली होती.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सभागृहात सांगितले कि ठाणे ते भिवंडी या मार्गीकेचे 80 % टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे.मात्र कल्याण ते भिवंडी या टप्प्यातील 5 किमी मार्गातील बाधितांचे मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करावे लागणार आहे. या टप्प्यातून मेट्रो जमिनीखालून नेण्याचे निश्चित झाले आहे.या संदर्भातल्या अहवालाचे काम टीसीएल कंपनीला दिले आहे. प्रकल्प अहवाल आल्यानंतर हे काम वेगाने केले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी भिवंडीतील मेट्रो रेल्वे चे काम गतिमान पद्धतीने होणार असल्याची घोषणा केल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानत स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *