भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी महानगर पालिकेचा अर्थ आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा सन 2024-25 चे 1002 कोटी 23 लाख 80 हजार रुपयांचे सुधारीत तर सन 2025-26 1097 कोटी 49 लाख 79 हजार रुपयांचे 9 लाख 69 हजार शिल्लक दर्शविणारे अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके यांनी प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांना आज सोमवारी सादर केला.भविष्यातील विकास कामांना चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे.

भिवंडी महापालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रक सभेसाठी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त देविदास पवार,
विठ्ठल डाके,मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके,उपायुक्त रोहीदास दोरकुळकर, उपायुक्त प्रणाली घोंगे,अनुराधा बाबर, विक्रम दराडे,उपायुक्त शैलेश दोंदे अंतर्गत लेखा परिक्षक नंदकुमार चौधरी,
संदीप पटनावर, नितीन पाटील व पालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.यावेळी आयुक्त अनमोल सागर यांनी स्पष्ट केले की, केले की शहराच्या विकास कामांकरिता निधीची आवश्यता व महानगरपालिकेचे उत्पन्न याचा ताळमेळ घेऊन सर्वप्रथम 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणा-या वर्षाकरिता प्रशासकीय तरतुदीसह सीएसआर फंडातून काही निधी उभारण्याचे प्रयत्न आहेत.शहर सौंदर्याकरण व सुशोभिकरण करणे यासाठी भिवंडी शहरामध्ये मोठा वाव आहे.त्या अनुषंगाने आवश्यकते नुसार तरतूद करुन सर्वांच्या सहकार्याने सुशोभिकरणा साठी मोहिम राबविण्यात येणार असून त्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे व त्यांच्या नियमित पणे बैठका घेण्यात येतील.शहर स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे व त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली असून ती वाढविण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे.भिवंडी महापालिकेमध्ये कर वसूलीसाठी विशेष लक्ष देण्यात आले नव्हते की जे महा पालिकेचे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत आहे.
संपूर्ण प्रशासना कडून सहकार्य करुन जास्तीत जास्त वसूली करण्या करीता प्रयत्न करणार जेणेकरुन वसूलीमध्ये वाढ होईल.बीजीपी दवाखान्यामध्ये ओ.पी.डी. सुरु झाली असून त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय सुरु करायचे आहे. याचा मुख्य उद्देश नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील त्याचबरोबर घरी होणारे बाळंतपणाची संख्या कमी होणार आहे.
पाणी पुरवठा शहरा मध्ये समप्रमाणात व योग्य प्रकारे होण्यासाठी 100 द.ल.लि.योजना सुरु होणार आहे व ती यशस्वी झाल्यानतर भिवंडी शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेल. भुयारी गटार योजना व पाणी पुरवठ्याच्या इतर योजना व सुविधांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.शिक्षण विभागाकरिता डिजिटल क्लासरुम शासनाच्या सहकार्याने उभारणे कामीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी तरतूद ठेवलेली आहे.सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्य उद्देश हा आहे की,अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात आली आहे त्याचा पूर्णपणे आवश्यकतेनुसार योग्यप्रकारे वापर करणे.अर्थसंकल्पामध्ये पुनर्विनियोजन करण्याची आवश्यकता पडू नये. यासाठी सर्व विभागांनी कामाची आवश्यकता लक्षात घेऊन बिलांसाठी मार्च महिन्याची वाट न पहाता वेळापत्रका नुसार खर्च करुन वेळच्या वेळी कामाची देयके सादर करावीत. अर्थसंकल्प सादर करण्यापेक्षा त्याची तरतूदीनुसार व योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे आहे. कामाची आवश्यकता व निकड भासल्यास पुनर्विनियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येईल.
कर्मचा-यांच्या सेवा विषयक बाबी परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने ई.एच.आर.एम.एस. आज्ञाप्रणाली विकसित करण्यात येईल.प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून सुव्यवस्थापन व पारदर्शकता येण्याकरिता ई-ऑफिस आज्ञाप्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.शहरातील उद्याने व स्मशानभूमी यांचे पर्यावरण पूरक संवर्धन करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील पदपाथ यांचे सुव्यवस्थापन व सुशोभिकरण करण्यासह वाहतूक व्यवस्था सुनियंत्रित करुन शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरण करणे हे प्रमुख उद्दिष्ट या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहेत.
चौकट
जमा बाजू
आरंभीची शिल्लक 256 कोटी 72 लाख 4 हजार विकास निधी 15 कोटी 30 लाख , इतर उत्पन्न व दायित्व 90 कोटी 37 लाख 64 हजार
मालमत्ता व पाणी पट्टी कर 97 कोटी 96 लाख,जी एस टी अनुदान 398 कोटी 78 लाख 5 हजार
भांडवली उत्पन्न 238 कोटी 36 लाख 6 हजार..
खर्च बाजू
—-
पाणी पुरवठा 201 कोटी 43 लाख 98 हजार कर्मचारी वेतन 375 कोटी 20 लाख 83 हजार सार्वजनिक बांधकाम 108 कोटी 82 लाख 35 हजार
आरोग्य सुविधा 38 कोटी 69 लाख 3 हजार इतर भांडवली खर्च 329 कोटी 4 लाख 67 हजार
विद्युत 32 कोटी 33 लाख 24 हजार
वाहने 5 कोटी 35 लाख,संगणक 2 कोटी अग्निशमन 2 कोटी 46 लाख, उद्यान 2 कोटी 5 लाख आहे.