भिवंडी ( प्रतिनिधी )ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाड्या वस्तीवरील आदिवासी खेडूत्यांच्या अज्ञान व अशिक्षित
पणासह गरिबीचा गैरफायदा घेत धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले असुन शासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन संबधीतांवर कारवाई करावी अशी मागणी होत असतानाच भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा गांव येथे होणारा
धर्मांतराचा गंभीर प्रयत्न बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने उधळून लावला आहे.
याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे ज्यामध्ये एका अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील पारोळ रस्त्यावरील भुईशेत या गावात मनोज गोविंद कोल्हा याचे घरासमोरील मोकळ्या जागेमध्ये येशु ख्रिस्तांची प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित केला होता.गावातील महिला,पुरुष व लहान मुलमुली यांना प्रार्थनेसाठी जमा करून तेथे आलेले साईनाथ गणपती सरपे, (वय ४२,रा. गोखीवरे, ता. वसई,)जेम्स वॉटसन, (वय ५८, सध्या रा. हिरानंदानी ईस्टेट, ठाणे (प), मुळ रहिवासी अमेरिका ) व मनोज गोविंद कोल्हा यांनी आपल्या सोबत आणलेली पुस्तके वाचून दाखवू येशु ख्रिस्तांचे प्रार्थनेचा तसेच ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत होते.यावेळी त्यांच्याकडून हिंदू धर्मावर टीका करीत ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख-समृद्धी लाभेल असे सांगुन हिंदू धर्म बदलण्यासाठी धर्मपरिवर्तन करण्याचे काम करीत तेथील लहान मुलींच्या कपाळावर हात ठेवून दैवीशक्तीचा वापर करुन त्यांच्यावर उपचार केल्याचे भासवले.ही माहिती स्थानिक नागरिक रविनाथ सावजी भुरकुट यांना कळताच त्यांनी हिंदुत्ववादी संघटनेसाठी काम करणारे बजरंग दलाचे नेते संदीप भगत,दादा गोसावी यांना कळवली.त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहिल्यानंतर भिवंडी तालुका पोलिस ठाण्यास याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळा वरून साईनाथ गणपती सरपे,जेम्स वॉटसन, मनोज गोविंद कोल्हा यांना ताब्यात घेत चौकशी केली असता,जेम्स वॉटसन हा परकीय(अमेरिका)
देशातील नागरिक असून २०१६ मध्ये सुरवातीला टुरिस्ट व्हिसा वर येऊन त्यानंतर व्यावसायिक (बिझनेस ) व्हिसा मिळवून तो भारतात वास्तव्यास आहे.
जेम्स वॉटसन हा भारतात कोणताही उद्योग विषय न करता फक्त ठाणे व पालघर जिल्ह्यात धर्मांतराचे काम करीत असून या धर्मांतर रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी दिली.भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात रविनाथ भुरकुट यांच्या तक्रारीवरून साईनाथ सरपे,जेम्स वॉटसन,मनोज कोल्हा या तिघांविरोधात विविध कलमां सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम व विदेशी व्यक्ति अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.

