भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा.सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे.त्यामुळे आज भिवंडी तालुक्यातील राहनाळ गांव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंदोत्सव साजरा केला.
भिवंडी ठाणे महामार्गावरील राहनाळ गांव येथील शाळेत होळी व धुळवड सणाच्या निमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच विद्यार्थी मुलांनी बीट, गाजर, झाडाची पान-फले आणि हळद यांच्यापासून नैसर्गिक रंग तयार केले. आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवऱ्या, कापूर, विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार नाहीसे करण्यासाठी होळीच्या भोवती पताका म्हणून मुलांच्या मनातील नकारात्मकता कागदावर लिहून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनी सिद्धी पांडे व परी बिंद यांच्या हस्ते होळी पेटवण्यात (प्रज्वलीत) करण्यात आली.यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीते सादर केली.तर अंकुश ठाकरे होलीकेची कथा व केंद्रप्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून सांगितला.शिक्षक राजश्री पाटील,अनघा दळवी,चित्रा पाटील ग्रामपंचायत लिपिक विश्राम नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक, पालक व विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम कार्यक्रम शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आला.
होळीसाठी जिवंत झाड तोडू नये, पाण्याची बचत करावी,केमिकल मिश्रित रंग वापरू नये,प्लॅस्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असे मौलिक मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी केले.पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली आहे असे मत प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक, बाळासाहेब राक्षे यांनी व्यक्त केले आहे.